कोरोनाः 'जो उत्साह दारू दुकानं उघडताना दाखवला त्यातला अर्धा तरी धार्मिक स्थळांसाठी दाखवा' #5मोठ्याबातम्या

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, facebook

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. जो उत्साह दारू दुकानं उघडताना दाखवला त्यातला अर्धा तरी धार्मिक स्थळांसाठी दाखवा - देवेंद्र फडणवीस

धार्मिक स्थळं हा लोकांच्या आस्थेचा विषय आहे. सध्याच्या काळात लोकांना मानसिक आधाराची गरज आहे. त्यामुळे धार्मिक स्थळं बंद ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्य नाही. जो उत्साह दारू दुकानं उघडताना दाखवला त्यातला अर्धा उत्साह तरी धार्मिक स्थळं उघडण्यासाठी दाखवा, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सांगली दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी हे वक्तव्य केलं. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

केंद्र सरकारने धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी देऊन एक महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले. इतर राज्यांमध्ये धार्मिक स्थळं उघडण्यात आली. पण महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं न उघडण्याचा राज्य सरकारचा निर्णय अजब आहे.

राज्यात दारू दुकानं, मॉल उघडले. पण धार्मिक स्थळं उघडण्यात आलेली नाहीत. दारू दुकानाने काय होतं आणि धार्मिक स्थळांमुळे काय होतं, याचा फरक सांगायची आवश्यकता नाही, असं फडणवीस म्हणाले.

कोरोना

फोटो स्रोत, Alamy

लाईन

2. संदीप सिंह आणि भाजप कनेक्शनच्या चौकशीची CBIला विनंती करणार - अनिल देशमुख

सुशांत सिंह प्रकरणात चर्चेत असलेले निर्माते संदीप सिंह यांचे भारतीय जनता पक्षाशी जवळचे संबंध असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

या प्रकरणी CBI ने संदीप सिंह आणि भाजप यांच्यातील कनेक्शनची चौकशी करावी, अशी विनंती करणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

अनिल देशमुख

फोटो स्रोत, facebook

संदीप सिंह आणि भाजप यांच्या चौकशीबाबत अनेक तक्रारी मला मिळाल्या.

ड्रग्सच्या अनुषंगाने त्याचे आणि भाजपचे काय संबंध आहेत, याची चौकशी करावी, अशी मागणी आम्ही CBI कडे करणार आहोत, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

3. तुम्ही मॅसेंजर ऑफ गॉड आहात, मग उत्तर द्या - चिदंबरम

कोरोनाचं संकट हे अॅक्ट ऑफ गॉड (देवाची करणी) आहे. त्यामुळे यंदा अर्थव्यवस्था आकुंचन पावेल, असं वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे.

तुम्ही मॅसेंजर ऑफ गॉड आहात, मग उत्तर द्या, असं चिदंबरम म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

कोरोना संकट देवाची करणी असल्याचं सांगत राज्यांना GST ची नुकसानभरपाई देण्यास केंद्र सरकार हतबल असल्याचं निर्मला सीतारमण काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या.

या वक्तव्याबाबत सोशल मीडियावर टीका सुरू असताना चिदंबरम यांनीही ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. "2017-18, 2018-19 आणि 2019-20 दरम्यान अर्थव्यवस्थेच्या अयोग्य व्यवस्थापनाचं वर्णन कसं कराल? अर्थमंत्री मॅसेंजर ऑफ गॉड याचं उत्तर देतील का," असा प्रश्न चिदंबरम यांनी विचारला आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

4. 'पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या नाहीत तर पुढची 50 वर्षं काँग्रेस विरोधी पक्षातच राहील'

काँग्रेस कार्यकारिणीसह पक्ष संघटनेतील प्रमुख पदांसाठी निवडणुका घेण्यात याव्यात, निवडणुकांना विरोध करणाऱ्यांना केवळ आपलं पद जाण्याची भीती आहे.

निवडलेल्या कार्यकारिणीने पक्षाचं नेतृत्व केल्यासच पक्षाला चांगले दिवस येतील. अन्यथा काँग्रेस पक्ष पुढील 50 वर्षे विरोधी पक्षातच राहील, असं वक्तव्य ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केलं आहे.

काँग्रेसमधील पक्षांतर्गत निवडणुका 10-15 वर्षांपूर्वीच निवडणुका घ्यायला हव्या होत्या. गेल्या कित्येक वर्षांपासून पक्षात निवडून आलेल्या समित्या नाहीत. यामुळेच आपला एकामागून एक निवडणुकांमध्ये पराभव होत आहे, असं आझाद म्हणाले. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

उदय सामंत

फोटो स्रोत, facebook

5. अंतिम परीक्षेबाबत निर्णय सोमवारी

अंतिम वर्षांच्या परीक्षा घेतल्याशिवाय पदवी देता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर राज्य सरकारने या परीक्षा घेण्याची तयारी दर्शवली आहे.

परीक्षा कधी व कशा पद्धतीने घ्याव्यात, याबाबत एक समिती बनवण्यात आली असून सोमवारी या समितीचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यामुळे अंतिम परीक्षांबाबतचा निर्णय सोमवारी घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

शनिवारी (29 ऑगस्ट) उदय सामंत यांची राज्यातील सर्व कुलगुरूंसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. यामध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती परीक्षेबाबत निर्णय घेणार आहे. सदर बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)