कोरोना व्हायरस : 'माझ्या छातीत दुखतंय, मला न्यायला या,' असा फोन करून तो चालता चालता वारला

फोटो स्रोत, FACEBOOK/RANVEERSINGH
- Author, अनंत प्रकाश
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
"माझ्या छातीत दुखतंय. मला न्यायला येऊ शकत असाल तर या"
हे शेवटचे शब्द होते दिल्लीहून आग्र्याला चालत जाणाऱ्या रणवीर सिंह यांचे. आग्र्याजवळच त्यांचा वाटेत मृत्यू झाला.
रणवीर दिल्लीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. मात्र लॉकडाऊन झाल्यानंतर दिल्लीत खाण्यापिण्याची आणि राहण्याची समस्या निर्माण झाल्यानंतर त्यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला.
मात्र वाहतुकीची सर्व साधनं बंद असल्याने रणवीर यांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी चालायला सुरुवात केली.
मृत्यूच्या दिवशी नेमकं काय झालं?
रणवीर यांनी आपल्या काही सहकाऱ्यांच्या बरोबर गावी जाण्याचा निर्णय घेतला. गावी जायला बस नसल्याने त्यांनी पायीच गावी जाण्याचा निर्णय घेतला.
दिल्लीहून ते फरीदाबादला पोहोचले. त्यावेळी त्यांचं बहीण पिंकीशी बोलणं झालं. ही रात्री साडेनऊची वेळ.
पिंकी यांनी तेव्हा काय बोलणं झालं ते सांगितलं. "त्या दिवशी अचानक भावाचा फोन आला. लॉकडाऊनमुळे काम नाहीये, त्यामुळे मी पायीच गावी यायला निघालोय असं तो म्हणाला. मला आश्चर्य वाटलं".

- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात

भावाशी बोलणं झाल्यानंतर औषधं घेऊन पिंकी झोपायला गेल्या. सकाळी जाग आल्यानंतर पाचच्या सुमारास त्यांनी भावाला फोन केला.
"फोन लागला तेव्हा पलीकडून भाऊ म्हणाला- माझ्या छातीत दुखतंय. मी त्याला म्हटलं की तू रस्त्याकडेला थोडा वेळ बस. आराम वाटेल. मी कोणाला तरी फोन करून सांगते."
चालताना रणवीर यांना काय झालं?
रणवीर दिल्लीहून मथुरामार्गे सकाळपर्यंत आग्र्याजवळ पोहोचले होते. मात्र सतत चालल्याने त्यांना दमायला झालं होतं. रस्त्यात एका ट्रॅक्टरवाल्याने त्यांना प्रवास करू दिला. मात्र तरीही त्यांचं बरंच चालणं झालं होतं.
रणवीर एकटे नव्हेत, त्यांच्याबरोबर त्यांच्या वयाचे तरुण, ज्येष्ठ नागरिक तसंच लहान मुलंही होती.
रणवीर राजधानी दिल्लीत एका हॉटेलात डिलिव्हिरी बॉय म्हणून काम करत होते. त्यांच्याबरोबर अरविंद नावाचे नातेवाईकही राहत होते.

फोटो स्रोत, Arvind singh
अरविंद यांच्याशीच रणवीर यांचं शेवटचं बोलणं झालं होतं. अरविंद सातत्याने रणवीर यांच्या संपर्कात होते. अरविंद यांना एका ट्रकमध्ये जागा मिळाली परंतु त्यांचे मेव्हणे चालत येत होते.
अरविंद यांनी सांगितलं की, रात्री माझं आणि त्यांचं बोलणं झालं. तेव्हाच ते दमल्याचं म्हणत होते. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे कोणीही त्यांना मदत केली नाही.
ते चालतच राहिले परंतु आग्रा येईपर्यंत त्यांची स्थिती ढासळली.
शेवटचे क्षण
रणवीर यांचा मृत्यू नॅशनल हायवे 2वर सकाळी साडेसहाच्या सुमारास झाला.
मात्र त्याआधी त्यांनी अरविंद यांना कॉल करून मदतीसाठी याचना केली होती. अरविंद यांनी नेमकं काय बोलणं झालं ते सांगितलं.
ते म्हणाले, "माझ्या छातीत खूप दुखत आहे. मला न्यायला येऊ शकत असाल तर या."
मी त्यांना मदतीसाठी 100 नंबर डायल करायला सांगितलं. कोणाची तरी मदत घ्या असं सांगितलं. मात्र माझ्या बोलण्यानंतर पलीकडून काहीच आवाज आला नाही.
या कॉलनंतर आठ-दहा मिनिटांनंतर ट्रकमधून उतरून मी पुन्हा रणवीर यांना कॉल केला. यावेळी दुसऱ्या कोणातरी कॉल उचलला. त्यांनी रणवीर यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर काय घडलं?
रणवीर यांच्या मृत्यूनंतर घरी शोकाकुल वातावरण आहे. रणवीर यांची पत्नी आणि तीन मुलं या दु:खातून सावरत आहेत.
रणवीर यांची बहीण पिंकी यांनी अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, "आमच्या वडिलांचं अकाली निधन झालं होतं. त्यानंतर भावानेच कुटुंबाची सगळी जबाबदारी स्वीकारली. त्यांना तीन मुलं आहेत. आता घरी कमावणारं कोणीच उरलं नाही.
घराकडे बघतो तेव्हा पुढे काय होणार काहीच कळत नाही. आमचं काय नुकसान झालंय हे कोणालाच कळू शकणार नाही. भावाने हे घर उभारण्यासाठी दीड लाखाचं कर्ज घेतलं होतं. आता त्याचं काय होणार?"

फोटो स्रोत, Pti
आमच्या घराचा आधारवड कर्ता माणूसच हरपला आहे हे सांगताना पिंकी भावुक होतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी झालेल्या मन की बात कार्यक्रमात लॉकडाऊनमुळे गरिबांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली होती.
रणवीर यांच्या कुटुंबीयांवर मोठं संकट कोसळलं आहे. रणवीर यांचे कुटुंबीय पंतप्रधान मोदींना माफ करतील का?
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























